बोगस बियाण्यांची विक्री, खतांचा काळाबाजार तसेच पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या दाव्यांमध्ये होणारी अनावश्यक दिरंगाई याबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. अशा प्रकारांमध्ये संबंधित दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्ह्यातील कृषी स्थिती, खरीप हंगामाची तयारी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना हे निर्देश दिले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांवर आणि खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.
तसेच पीक विमा कंपन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या दाव्यांचा वेळेत निपटारा करावा. अनावश्यक विलंब करून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकणाऱ्या कंपन्यांविरोधातही आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी प्रशासनाला कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि इतर आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यास सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


